Wednesday 26 October 2011

सहय़ाद्रीचं दुर्गरत्न! कांगोरी
देश आणि कोकणाला जोडणाऱ्या महाडजवळील वरंध घाटाच्या डोईवर चढले, की भोवताली सहय़ाद्रीच्या डोंगररांगांचे जणू तांडव उभे राहते. भल्यामोठय़ा लांबलचक पसरलेल्या मुख्य रांगेला तितक्याच ताकदीच्या- चढाईच्या उपशाखा फुटल्या आहेत. धडकी भरवणाऱ्या या डोंगररांगा, त्यांचे सरळसोट सुळके-कडे, निबिड अरण्य, घाटवाटा आणि ते रोखणारे गडकोट या साऱ्यांनी जणू इथे ‘गोंधळ’ मांडला आहे. या गुंत्यातच एक दुर्गरत्न कधीचे वाट हरवून बसले आहे- दुर्ग कांगोरी ऊर्फ मंगळगड! या कांगोरीकडे जायचे म्हणजे वरंध घाटाच्या पायाशी असलेल्या माझेरी गावी पायउतार व्हायचे. इथून उत्तरेकडची एक वाट शिवथरघळकडे निघते, तर दक्षिणेची डोंगरदरीतून तळे, किये गावांना भेट देत कांगोरीच्या पायाशी पिंपळवाडीत थांबते. पण या वाटेने जायचे म्हणजे ‘विनोबा एक्स्प्रेस’चे तिकीट काढायचे आणि पाच-साडेपाच तासांची पायपीट करायची! कांगोरीला यायला दुसरा मार्ग महाडहून! महाडहून या पिंपळवाडीसाठी एसटी बसची सोय. दिवसभरात चार-पाच फेऱ्या. या एसटीने ढालकाठी, खरवली, रूपवली या कोकणी गावांची भेट घेत पिंपळवाडीत यायचे. एकूणच पुण्या-मुंबई किंवा अन्य ठिकाणहून यायचे झाल्यास एखाद्या मुक्कामाची तयारी ठेवत कांगोरीकडे पावले वळवायची. यासाठी पायाच्या पिंपळवाडीतील मंदिरे सोयीची. इथे आपली पथारी लावायची आणि भल्या सकाळी गडाला भिडायचे! गडावर जाण्यासाठी पिंपळवाडीच्या पूर्वेला असलेल्या शेडगेवाडीपर्यंत यावे. इथून एक वाट गडावर चढते. उंची अदमासे अडीच हजार फूट! तासा-दीड तासात आपण गडाच्या दरवाजात हजर होतो. दरवाजाच्या कमानीने कधीचीच मान टाकलेली, तसे भोवतीचे बुरूजही आता थकलेले! हे सारे ओलांडत आत शिरावे ते थेट गडाच्या माचीत! अद्भुत माची पूर्वेकडे माची आणि पश्चिमेकडे त्याहून उंचीचा बालेकिल्ला ही कांगोरीची रचना! यातील पूर्वेकडची माची म्हणजे या गडाचे एक अद्भुत रूपच! तिला पाहिले, की प्रतापगडाच्या माचीची आठवण होते. चांगली अर्धापाऊण किलोमीटर लांबीची ही माची
altसमोरच्या मुख्य डोंगररांगेतील कामथे घाट-अस्वल खिंडीवर नजर ठेवते. हिची तट-बुरुजांची चिलखते अद्याप शाबूत आहेत. टोकाकडे एक भरभक्कम लढाऊ बुरूजही! साऱ्या गडावरच गवत माजलेले असल्याने या गवताखाली हा सारा ठेवा मात्र झाकलेला आहे. एखादा ऐवज लपवून ठेवावा तसा! इथेच टोकाशी थोडय़ाशा उंचवटय़ावर काळभैरवनाथाचे मंदिर! गंमत अशी, की हा आहे भैरव, पण काही मंडळी त्याची कांगोरीदेवी म्हणून पूजा बांधतात! अगदी गडावरच मुक्काम करायचा असेल तर या मंदिराचा थोडाफार आसरा आहे. या मंदिराशिवाय या माचीतच अन्य एका चौथऱ्यावर ओळीने काही देवतांच्या झिजलेल्या मूर्ती दिसतात. शिबंदीची काही घरं आणि बुजलेली एक-दोन टाकीही दिसतात.
या माचीतून वर बालेकिल्ल्यात शिरावे. किल्लेदाराचा वाडा, शिबंदीची घरे, तळी, पाण्याचे खोदीव हौद असे एकेक दिसू लागते. पण मोडल्या वाटा आणि थांबलेल्या वावराने या साऱ्यावर आता काळाने आपले हातपाय पसरले आहेत. यामुळे बांधकामे ढासळली, पाणवठे शेवाळले आणि सर्वत्र झाडांचे रान माजले! नाही म्हणायला या अडगळीत अत्यंत मधुर चवीचे एक टाके मात्र अद्याप भटक्यांच्या तृष्णेला शांत करते. या साऱ्या अडचणीतूनच वाट काढत फिरावे. तो या वास्तू त्यांच्या या व्यथेतून कांगोरीची कथाही सांगू लागतात. कांगोरीवर अनेकदा जाणे झाले. त्यातही दिवाळी संपली, की जावळीच्या या खोऱ्यातला ट्रेक ठरलेला असायचा. एका भेटीवेळेची एक गंमत सांगतो. भल्या सकाळी पिंपळवाडीतून गडावर आलो. काही मित्रांसमवेत गडावरच्या वास्तूंची मापे घेत होतो. याच वेळी पलीकडच्या गावातील काही लोक या कांगोरी मार्गे पिंपळवाडीकडे निघाले होते. त्यांनी पाहिले आणि एकमेकांत चर्चा सुरू केली. ‘सरकारी लोकं दिसत्यात. मोजमापं घेत्यात म्हणज्ये, गड पुन्हा बांधायला काढणार वाटतं!’ ..आमची बिचारी जनता अजूनही आशा बाळगून आहे, की सरकार येईल आणि त्यांच्या शिवाजीराजांच्या गडाचे गतवैभव पुन्हा उभे करेल! जावळीच्या चंद्रराव मोऱ्यांचा हा प्रदेश! त्यांच्या राजवटीतच
कधीतरी हा गड अस्तित्वात आला आणि मोऱ्यांच्या अनभिषिक्त राज्याचा चाकर बनला. पुढे या मोऱ्यांचे शिवरायांनी पारिपत्य केले आणि कांगोरी स्वराज्याचा शिलेदार झाला. याच वेळी शिवरायांनी गडाचे नाव ठेवले ‘मंगलगड’! ज्याचेच पुढे झाले मंगळगड!! ऐन घाटमाथ्यालगत असल्याने त्याच्याकडे या वाटांवर लक्ष ठेवण्याचे काम आले. पुढे दुर्गमतेमुळे तो स्वराज्याचा तुरुंगही बनला. अनेक अपराध्यांना कांगोरीने आपल्या नजरकैदेत ठेवले. ज्यात पुढे इसवी सन १८१७ मध्ये मद्रास रेजिमेंटच्या हंटर आणि मॉरिसन या अधिकाऱ्यांचाही समावेश होता. रायगड राजधानी बनल्यावर भोवतालच्या दुर्गचौकटीत कांगोरीचाही समावेश झाला. यामुळे ज्या ज्या वेळी रायगडावर आपत्ती आली, त्या त्या वेळी कांगोरीच्या फौजा रायगडाच्या मदतीला धावल्या. असा हा स्वराज्याचा शिलेदार इसवी सन १८१८च्या अखेरच्या घटकेपर्यंत निष्ठेने लढत राहिला. १८१८च्या शेवटच्या मराठे-इंग्रज युद्धात कर्नल प्रॉथरच्या हल्ल्यात कांगोरीची ही धडपड कायमची शांत झाली. असे म्हणतात, इतिहास संपतो तिथे भूगोल उजाडतो! बालेकिल्ल्यावरून फिरताना भोवतालचा हा सहय़ाद्री पुन्हा मनाची कालवाकालव सुरू करतो. कांगोरीचा हा उभा-आडवा पर्वत बुद्धिबळातील वजिराच्या सोंगटीप्रमाणे या साऱ्यांमध्ये उभा असतो. भोवती काय काय दिसते.. अगदी उत्तरेकडून सुरुवात केली तर रायगड, लिंगाणा, कोकणदिवा, तोरणा, राजगड, कावळय़ा, वरंधची रांग, दुर्गाडीचे शिखर, रामेश्वर-कोळेश्वर-
महाबळेश्वरचे पठार, चंद्रगड ऊर्फ ढवळगड, प्रतापगड,  मकरंदगड असे सारे सहय़ाद्री मंडळच अंगावर येते. अनेक रांगा या कांगोरीकडे धावत येत असतात. तर काही दूरदूरवर अस्पष्ट होत अथांग सागरातील लाटांप्रमाणे सांगावा धाडत असतात. वेड लागायला होते, भान हरपायला होते, मंत्रमुग्ध व्हायला होते. या अशा अनगड गडांवर का जावे, या अशा शिखरांवर का पोहोचावे याचीच ही उत्तरे..! समोरच्या माचीतील भैरवाच्या मंदिरावरचा भगवा ध्वज दिमाखात फडफडत असतो. तुमच्या माझ्या अस्तित्वाची ती एकच काय जाणीव! 
विस्मृतीतला दुर्ग न्हावी रतनगड


सह्य़ाद्री कोळून पिलेल्या एखाद्या जातिवंत भटक्याला विचारलं, की महाराष्ट्रातील किल्ल्यांची सर्वात जास्त संख्या कोणत्या जिल्हय़ात आहे, तर बिनविरोध नाशिक जिल्हय़ाची निवड होईल. इथे ‘धोडप’ सारखा सातमाळा रांगेचा सम्राट आहे, तर ‘सप्तशृंग’ सारखे भाविकांचे श्रद्धास्थानही आहे.प्राचीनतेचा वारसा जपणारा इंद्राई किल्ला इथे आहे, तर महाराष्ट्रातील सर्वोच्च गिरिदुर्ग साल्हेर, तोही या नाशिक जिल्हयातच. निसर्गाने अन् सह्य़ाद्रीने नाशिक जिल्ह्य़ातील गिरिदुर्गांना काही कमी पडू दिलेलं नाही.तुमच्यापैकी अनेक जण साल्हेरवर जाऊनही आले असतील.सर्वोच्च दुर्ग जरी असला तरी साल्हेरचा माथा गाठणं तितकसं अवघड नाही.हा साल्हेर सह्य़ाद्रीच्या ज्या डोंगररांगेत वसला आहे त्याला म्हणतात डोलबारी रांग.साल्हेरच्या पुढचे सालोटा़, मुल्हेर-मोरा-हरगड हे या रांगेतले दुर्ग म्हणजे भटक्यांची राजधानी! पण साल्हेरच्या परशुराम
altशिखरावर उभं राहून उत्तरेकडे नजर टाकली की एक बेलाग सुळक्यांची रांग दिसते.ही आहे सेलबारी अथवा शैलबारी रांग.आणि यातला बिनीचा दुर्ग म्हणजे न्हावी रतनगड. अभेद्यपणाचे आणि दुर्गमतेचे शिखर गाठलेला.चढाईसही तितकाच आव्हानात्मक. लांबून बघताना याचा उत्तुंग सुळका अस्मानाला गवसणी घालताना दिसतो.परंतु त्यामागे दडलेला अनगड दुर्ग मात्र जवळ गेल्याशिवाय दर्शन देत नाही.महाराष्ट्रतील उत्तर- दक्षिण पसरलेली ही सेलबारी रांग चार गिरिशिखरांची.न्हावी रतनगड़, तांबोळ्या डोंगर आणि मांगी-तुंगीचे कातळसुळके यांनी सजलेली ही रांग. नाशिक जिल्ह्य़ातील बागलाणाचा इतिहासप्रसिद्ध मुलूख आणि गुजरातचा डांग जिल्हा यांच्यातील नाते सांगणारी. नगर
altजिल्ह्य़ातील भंडारदऱ्याच्या सान्निध्यातील रतनगडाच्या सरत्या वर्षांऋतूतील रूपावर भाळून दरवर्षी त्याची वारी करणारे अनेक जण आहेत.पण रतनगडाशी नामसाधम्र्य असलेल्या या न्हावी रतनगडाकडे मात्र ट्रेकर्सनी पाठ फिरवलेली दिसते. नाशिक जिल्ह्य़ातील सटाणा या तालुकास्थळापासून प्रवास सुरू केला की आपण तासाभरात ताहराबादला
पोहोचतो.ताहराबादहून पिंपळनेर रस्ता धरायचा आणि सुमारे १५ कि.मी वरच्या भिलवड गावात येऊन पोहोचायाचं.पिंपळनेर रस्त्यावर मांगी-तुंगीच्या दिशादर्शक कमानीपासून डावीकडे वळालो की ६ कि.मी.वर भिलवड आहे.हा मांगी-तुंगीचा पायथा.सुमारे साडेतीन हजार पायऱ्यांची तंगडतोड केली की मांगी- तुंगीच्या सुळक्यांखाली आपण येतो.पण आपल्याला न्हावी रतनगडाला जायचं असल्याने मांगी-तुंगीचा नाद सोडायचा आणि भिलवड गावातून अध्र्या तासात काहीशा कच्च्या रस्त्याने न्हावी रतनगडाचा पायथा गाठायचा.गावाचे नाव वडाखेल. एक लहानशी आदिवासी वस्ती.गावाच्या एका बाजूला न्हावी रतनगडाचा सुळकेवजा किल्ला तर दुसऱ्या बाजूला तांबोळया डोंगर. न्हावी
रतनगडाच्या कडयातलं नेढंही वडाखेलमधून स्पष्ट दिसतं आणि पाहताक्षणी कुतूहल जागृत करतं. गावातून शेतं तुडवत निघायचं आणि पंधरावीस मिनिटात पाताळवाडी गाठायची.गावाचं नाव जरी ‘पाताळवाडी’ असलं तरी गाव बऱ्यापैकी उंचीवर आहे. पाताळवाडीतील ग्रामस्थ मात्र आतिथ्यशील आहेत.त्यांच्यातील एकाला वाटाडया म्हणून बरोबर घेतलं की वाट शोधण्याचे कष्ट वाचतात.पाताळवाडीतून एक पायवाट समोरच्या टेकाडाला वळसा घालून त्याच्या माथ्यावर विसावली आहे.आपण अध्र्या पाऊण तासात इथं पोहोचलो की चढाईचा पहिला टप्पा इथे संपतो.सध्या इथे एक देवाचे ठाणे असून त्याभोवती रंगीत झेंडे लावले आहेत.ही आपली वाट बरोबर असल्याची खूण.आता आजूबाजूचा प्रदेश नजरेसमोर तरळायला लागतो.या पठारावरून दोन वाटा फुटतात.एक जाते ती किल्ल्याच्या बेलाग कडयावर खोदलेल्या पायऱ्यांवरून, तर दुसरी किल्ल्याच्या कातळकडयाखालून.पहिली वाट तशी बऱ्यापैकी कठीण आणि तितकीच जोखमीची.त्यामुळे आपण दुसऱ्या वाटेचे बोट धरून चालायला लागायचं.या वाटेवर सप्तशृंगी देवीचे एक देऊळ तारेच्या कुंपणांनी बंदिस्त केले आहे.आता वाट वरच्या बाजूला वळून कडयाखालून जायला सुरूवात करते.आपणंही तसंच जायचं.या वाटेवर पाण्याची अनेक खांबटाकी, खोदीव टाकी व पायऱ्या आहेत.किल्ल्याच्या कडय़ाच्या वाटेने गेल्यास या सगळया सुंदर दुर्गवैशिष्टयांचे दर्शन घेणे शक्य होत नाही.वर कठीणतेशी सामना करावा लागतो तो
वेगळाच. या वाटेने एका तासात भग्न दरवाजातून गडावर प्रवेश करायचा.नीट पाहिल्यास दरवाजाचे बुरूज मात्र अवशेषस्वरूपात दिसतात.गडाचा विस्तार फार नसला तरी त्याचा लांबुळका आकार मात्र लक्षवेधी आहे.गडमाथ्यावर वाडयाचे अवशेष आणि जोडटाक्याचा समूह सोडला तर बाकी काही नाही.पण खरं आव्हान मात्र पुढे आहे. आपल्याला लांबून दिसलेला किल्ल्याचा जो गगनचुंबी सुळका आहे त्याचा माथा गाठणं वाटतं तितकं सोपं नाहीये.टाक्यांपासून सरळ चालत गेलो की किल्ल्याला विभागले आहे ते त्याच्या नेढयाने. एक अतिशय चिंचोळी वाट या नेढयावरून किल्ल्याच्या माथ्यावर गेली आहे.जेमतेम एक माणूस जाऊ शकेल इतकीच ही वाट.पण दोन्ही बाजूला पाताळवाडीची पाताळस्पर्शी खाई आहे. अगदी तारेवरची कसरत करून गेल्यावर किल्ल्याच्या सर्वोच्च माथ्यावर हुश्श म्हणायचं.अगदीच जर वाटत असेल तर आपण काय दिव्य पार करून आलोय हे पहायला मागे नजर टाकली तरी पाय थरथरतात. कोणाही अनुभवी ट्रेकरच्या काळजाचा ठोका चुकविणारी ही वाट आहे.या सुळक्याच्या सर्वोच्च माथ्यावर झेंडय़ाची काठी लावलेली आहे.आता जरा निवांत व्हायचं आणि आपलं अभिनंदन करायला उभे असलेले किल्ले लक्ष देऊन न्याहाळायचे.समोर साल्हेर-सालोटा, मुल्हेर- मोरा-हरगड़ डावीकडे मांगी-तुंगीचे मनोरेवजा सुळके आणि तांबोळया, तर उजवीकडे गुजरातचा डांग जिल्हा लांबवर पसरलेला दिसतो.आपल्या मनात हे चित्र कायमचं कोरून घ्यायचं आणि पुन्हा नेढयावरची कसरत करून परतीच्या वाटेला लागयचं.न्हावी रतनगडाची ही सफर आडवाटेची तर आहेच पण साहसाचा अनोखा अनुभव देणारीही आहे.हा दुर्ग फारसा
अवशेषसंपन्न जरी नसला तरी स्वत:ची एक वेगळी मोहोर तो आपल्या मनावर उमटवून जातो.अनेक सह्य़शिखरांचे एका वेगळया कोनातून मनस्वी दर्शन घडवतो आणि नव्या आव्हानांचा स्वीकार करायला भाग पाडतो.